Wednesday 31 December 2008

०८ चे आठवावे अनुभव

जानेवारी ०८
डिसेंबरच्या शेवटास झालेल्या जुन्या मित्राचा मृत्यू आणि नव्या नोकरीसाठी झालेली मुलाखत अशा संमिश्र वातावरणात वर्ष सुरू झाले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कॉल येईल असे सांगितलेले असल्याने त्याची वाटच पाहत होतो. अशात ४ तारखेच्या सुमारास इकडची पगारवाढ आणि तिकडची नोकरी असे दोन्ही एकाच वेळेस योग आले. अशा वेळेस दुसरा पर्याय लाथाडणे हा मूर्खपणा ठरला असता. त्यामुळे तोच स्वीकारला. त्याचा फायदा एवढाच झाला की आठ ते दहा दिवसांची सुट्टी मिळाली. या काळात नांदेडला मुक्काम केला आणि आठवण्यासारखी गोष्ट म्हणजे शेवटच्या चार दिवसांत केलेला सुमारे एक चतुर्थांश भारताचा प्रवास! आधी ता. १४ ला नांदेडहून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे गेलो. तेथे एक दिवसाचा मुक्काम करून दर्शन वगैरे करून परतलो. मध्ये एक दिवसाचा खंड करून १६ तारखेला नांदेडहून आधी सिकंदराबादला गेलो. का? तर पॉंडिचेरीच्या नेहमीच्या मार्गापेक्षा वेगळा मार्ग निवडायचा म्हणून. शिवाय नियोजन करून प्रवास करण्याने माणसाने भौतिक स्थानांतरण होते, पण त्याच्या अकलेत काडीमात्र बदल होत नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे. ‘यस्तु संचरते देशान’ वगैरे झाल्यानंतर ‘तैलबिंदुरिवाम्भसा’ होण्यात नियोजन हा फार मोठा अडसर आहे. 

असो. मग गाडी थेट सिकंदराबादला जात नाही म्हणून सिताफळमंडी येथे उतरणे, तेथून सिंकदराबादला जाणे असे सव्यापसव्य केले. सिकंदराबादला कळाले, की तेथून चेन्नईला जाण्यासाठी गाडी नाही. मग सिंकदराबादहून हैदराबादला जाणे क्रमप्राप्त झाले. जायचे कसे हे तर माहित नाही. ऑटोरिक्षाला विचारले तर ८० रु. भाडे. शेवटी तीन ठिकाणी विचारणा करून सिटीबसमध्ये चढलो. हैदराबादच्या स्थानकावरून अनेक वर्षांपूर्वी चारमिनार एक्सप्रेसने चेन्नईला गेलो होतो. आता गेलो तर तिथूनही चैन्नईला दुसऱया दिवशीच गाडी असल्याचे कळाले. मला तर तीन दिवसांत पुण्याला परतायचे होते. त्यासाठीही आधी खासगी ट्रॅवल्सकडे चौकशी केली. अशा चार लोकांशी बोलल्यानंतर एवढेच लक्षात आले, की चैन्नईला जाणाऱया बसेस नेल्लुरूहून जातात आणि तिथले भाडे चारशेच्या खाली नाहीत. मग तेथून बस स्थानक गाठले. त्यासाठीही रिक्षावाल्यांशी चार समजुतीच्या गोष्टी बोलून झालेच होते. 

सुदैवाने आंध्र प्रदेशच्या राज्य परिवहन सेवेची भाड्यांच्या बाबतीत तरी खासगी गाड्यांशी स्पर्धा नाही. त्यामुळे दोनशे रुपयांत नेल्लुरूचे तिकिट मिळाले. थंडी मी म्हणत असताना केलेला रात्रभराचा प्रवास आजही मला आठवतो!
 
नेल्लुरूला बारा वाजता पोचल्यानंतर तेथून पुन्हा चैन्नईसाठी गाडी पकडणे आलेच. माझी अपेक्षा अशी होती, की ज्याअर्थी सगळ्या ट्रॅव्हल ऑपरेटर्सच्या तोंडी नेल्लुरूचे नाव होते, त्याअर्थी ते चेन्नईपासून जवळ असेल. मात्र दुपारी दोनच्या सुमारास गाडीत बसल्यावर जेव्हा साडे सहा वाजले तरी चैन्नईची चिन्हे दिसेनात तेव्हा काळजी वाटायला लागली. सरतेशेवटी दिवेलागणीच्या सुमारास चेन्नईच्या भूमीवर पाय टेकले. नांदेडहून निघून एव्हाना चोवीस तासात रेल्वे, ऑटो, सिटीबस आणि दोन राज्यांच्या बस असा एकूण वीस तासांचा प्रवास केला होता. त्यामुळे कोयम्बेडु मोफुसिल बस टर्मिनसवर उपलब्ध असलेल्या डॉर्मिटरीचा उपयोग करण्याशिवाय पर्याय नव्हता. 

दुसऱया दिवशी सकाळी पॉंडिचेरीकडे प्रस्थान केले. तिथे श्री अरविंद आश्रमाच्या विश्रामगृहात एक दिवस मुक्काम. तिथेही एका दिवसाच्या बोलीवर खोली मिळाली. त्यामुळे आदल्या दिवशी अकरा वाजता ताबा घेऊन दुसऱया दिवशी सकाळी नऊ वाजता तिथून निघावेही लागले. मलाही एका दिवसापेक्षा जास्त थांबणे शक्य नव्हते. दुपारी पॉंडिचेरीहून निघालो आणि संध्याकाळी चैन्नईला पोचलो. तिथून मुंबई मेल रात्री निघत असल्याने स्टेशनवरच वेळ काढला आणि गाडीत बसलो. तिथून सुमारे चोवीस तासांनंतर पुण्यात उतरलो तेव्हा स्वयंस्फूर्त प्रवासाची हौस मोठया प्रमाणात भागली होती.

आता वर्षभराच्या दगदगीनंतर आणि बंदिस्त जीवनशैलीनंतर मला कोणी विचारलं, असा प्रवास पुन्हा करणार का तर उत्तर देईनः नक्कीच!



यस्तु संचरते देशान पंडितानपर्युपासते
विस्तारते तस्य बुद्धी तैलबिंदुरिवाम्भसा

जो विविध प्रदेशात प्रवास करतो आणि विद्वानांची सेवा करतो, त्यांच्या सहवासात राहतो त्याची बुद्धी तेलाचा थेंब ज्याप्रमाणे पाण्यावर पसरतो त्याप्रमाणे विस्तारते.

Tuesday 30 December 2008

नव्या वर्षाचा संकल्प

नव्या वर्षासाठी माझा संकल्प...कोणालाही नव्या वर्षाच्या शुभेच्छा पाठवायच्या नाहीत. गेल्या वर्षीच्या शुभेच्छा अजून संपल्या नाहीत. अन २००८ ची काया अवस्था झाली आहे हे वेगळे सांगायची गरज आहे असे मला वाटत नाही.

Saturday 6 December 2008


Thursday 4 December 2008

देशाच्या सुरक्षेबाबत देशात मोठी चर्चा चालू आहे. जेथे मूळ हल्ला झाला त्या राज्यात मात्र वेगळीच समस्या उभी आहे.