Tuesday, 16 June, 2009

भ्रष्टराज 'गुरू'!

बरोबर वीस वर्षांपूर्वी मी राजगुरूनगरला (ज्याला स्थानिक लोकं अजूनही आवर्जून खेड म्हणतात) गेलो होतो. त्यावेळी मी एक साधा विद्यार्थी होतो आणि एनसीसीच्या शिबिरासाठी तिथे पोचलेल्या 100 हून अधिक विद्यार्थ्यांपैकी एक होतो. नोव्हेंबर 2 ते 12, 1989 या दहा दिवसांमध्ये एके दिवशी आम्हाला हुतात्मा राजगुरू यांचा वाडा बघण्यास नेले होते. त्यावेळी येथेच या वाड्याच्या नावावर स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्यांची बातमी द्यावी लागेल, हे मला कुठे माहित होते. पण तसे झाले खरे. शिवराम हरी राजगुरू यांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या घरातील वस्तू लोकांनी कशा पळविल्या हे 1989 साली ऐकायला मिळाले. तर राजगुरु स्मारकाच्या नावावर 70 लाख रुपये पळविण्याचा कसा डाव रचण्यात आला, हे 2009 साली ऐकायला मिळाले.

Rajguru Wada
हुतात्मा सिवराम हरी यांची गेल्या वर्षी जन्मशताब्दी साजरी झाली. त्याआधी सुमारे 12 वर्षांच्या खटपटीनंतर राज्य सरकारने राजगुरू यांचा जुना वाडा संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला. या वाड्याच्या दुरुस्ती आणि नवीनीकरणासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निदी मंजूर झाला होता. त्याअंतर्गत शिवराम हरी यांची जन्मखोली, देवघर आणि नदीकाठची भिंत यांचे बांधकाम करण्याची मूळ योजना होती. हे काम 24 ऑगस्ट 2008 (शिवराम हरींच्या जन्मशताब्दी समापनापर्यंत) पूर्ण व्हायचे होते. प्रत्यक्षात पुरातत्व खाते आणि त्यांच्या ठेकेदारांनी धडाधड जुन्या इमारती पाडून टाकल्या. त्याजागी नव्या इमारती मनमानी पद्धतीने उभारण्यास सुरवात झाली. स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर ते निकृष्ट बांधकाम पाडण्यात आले. नंतर जन्मशताब्दीच्या निमित्ताने घाईघाईने जन्मखोली बांधण्यात आली. एवढे सगळे घडल्यानंतर तिथे सगळे काम अर्धवट टाकण्यात आले. गेले वर्षभर हा वाडा ओबडधोबड अवस्थेत उभा आहे.
Rajguru Wada
विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाल्याचे मी वाचले म्हणून काल मी राजगुरूनगरला गेलो। राजगुरुंच्या वाड्याला भेट दिलेली असली तरी वीस वर्षांमध्ये आठवणींच्या कपाटातील अनेक वस्तू बदलल्या होत्या. फक्त आठवत होती ती त्यांच्या जन्मखोलीतील एका छोट्याशा खिडकीतून दिसणारी भीमा नदी-चमचम करणारे पाणी आणि मंद प्रवाह. ते दृश्य अद्यापही मला लख्ख आठवते. काल गेलो तेव्हा हा वाडा आणखी भकास झाल्याचे पाहताक्षणी जाणवले. कालही मी आत खोलीत गेलो आणि परत ते दृश्य पाहण्याचा प्रयत्न केला.
Birthplace of Rajguru
ज्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण लावून धरले त्यांच्यांपैकी एक सुशील मांजरे यांची भेट झाली। मांजरे यांनी एकेका गैरप्रकाराचा पाढा वाचावयास सुरवात केली. जन्मखोलीचे मूळचे स्वरूप बदलून टाकले आहे, नदीकाठच्या भिंतीत वाड्याचे जुने दगड वापरून नव्या दगडाचे पैसे लावले आहेत, शिवाय संपूर्ण दगडाची असलेली भिंत वीटांनी बांधायचा प्रयत्न...एक ना दोन. शिवराम हरींच्या जन्मखोलीचेच सध्याचेच काम अगदी एखाद्या चाळीच्या खोलीसारखे केले आहे. मात्र आधी याहूनही वाईट बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ती खोली पाडायला लावली. नदीकाठच्या भिंतीचे कामही असेच पाडायला लावले. त्यानंतर ते आजतागायत सुरू झालेले नाही.
Rajguru Wada
या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आनंद गावडे आणि हरिदास गोकुळे या दोघांनी 7 जूनपासून उपोषण सुरू केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी 10 जून रोजी राजगुरूनगर बद पाळण्यात आला. दोषींवर सात दिवसाच्या आत कारवाई करू, या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार दोघा कार्यकर्त्यांनी उपोषण सोडले. या प्रकरणाबाबत बोलताना गावडे यांना थांबविणे अशक्य होत होते. वाड्याचे बांधकाम बंद का पडले म्हणून या कार्यकर्त्यांनी शोध घेतल्यावर त्यांना कळाले, की ठेकेदारांना बिल देण्यासाठी जिल्हा कोषागारातून 70 लाख रुपये उचलण्यात आले आहेत. खरी गंमत पुढेच आहे. हे 70 लाख रूपये घेतल्याबद्दल कार्यकर्त्यांनी पुरातत्व खात्याचे सहसंचालक डॉ. चेतन साळी यांच्यावर संशय घेतला. लगेच दोन दिवसांत पुरातत्व खात्याच्या बँक खात्यात 58 लाख रुपये भरण्यात आले. एवढे करूनही प्रशासन मात्र या भ्रष्टाचाराची जबाबदारी कोणावर टाकण्यास तयार नाही.
rajguru wada
गावडे आणि गोकुळे यांच्या उपोषणानंतर 'ज्वलज्जहाल' वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी एंट्री मारली। दहा जूनला त्यांनी त्यांच्या शैलीत भाषण करून वाहतूक रोखून धरली. (डॉ. साळीला राजगुरूंच्या पुतळ्यासमोर जीवंत जाळू हे बंडातात्यांच्या त्या दिवशीच्या भाषणातील एक वाक्य.) त्यानंतर मात्र प्रशासनाने दखल घेतली. अगदी दोन दिवसांपूर्वी पुरातत्व खात्याचे एक पथक वाड्याला भेट देऊन गेले.
दरम्यान, विधानसभेत हा प्रश्न चर्चेला आला तेव्हा तब्बल तीन सदस्यांनी चर्चेत भाग घेऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या!

इन्किलाब जिन्दाबाद!

Friday, 29 May, 2009

नेमेची येतात निवडणुका...अन जातीयवाद

निवडणुकीच्या तोंडावर कोंग्रेस सरकारने काढलेल्या वटहुकुमाने आपले काम नेमके केले आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांना जातीच्या वादात अडकावायचे आणि इकडे आपला कार्यभाग साधुन घ्यायचा, अशी बिनतोड़ योजना कोंग्रेसने आखलेली आहे. त्याचा पहिला टप्पातरी यशस्वीपणे पार पडला आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने ३०० कोटी रुपये उधळण्याची पूर्वपीठीका ही आहे।

एरवी बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाला मराठा संघटनांचा असलेला विरोध मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना माहीत नसावा, हे शक्य आहे का? बाबासाहेबांच्या नावाला विरोध होणार आणि तो मराठा सन्घटनान्कडूनच होणार ही खूनगाठ बांधूनच हा खेळ खेळण्यात आला. त्यानुसार विनायक मेटे आणि पुरुषोत्तम खेडेकर या महामानवांनी बाबासाहेबांवर दुगाण्या झाडल्या. संसदेच्या निवडणुकीतील यशाने भरात आलेल्या आणि शिवाशाहीरांशी निष्टा बाळगून असलेल्या राज ठाकरे यांनी अगदी साहजिकपणे बाबासाहेबांची बाजू घेतली. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून संभाजी ब्रिगेडने उद्या (शनिवारी) पत्रकार परिषद बोलाविली आहे. त्यासाठी कादालेल्या पत्रकातील भाषा पाहून मला आपले वाटले, की त्या मजकुराचा पहिला कागद जागच्या जागीच जाळून गेला असावा.
राज यांनी सांगितले नसते, तरी अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे, की मराठा संघटनांच्या मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे पाठबळ आहे. त्यातही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तर अंगातील सगळे बळ याच संघटनांचे आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा घाव राष्ट्रवादीच्या वर्मावर बसला असल्यास नवल नाही. काँग्रेस नेते by default आपली संघटना सर्वसमावेशक असल्याचे सांगू शकतात. राष्ट्रवादीला ती सोय नाही. राष्ट्रवादीच्या या प्रतिमेमुळे आताच्या निवडणुकीत मराठवाडा आणि विदर्भात अन्य सर्व जाती एकवटून मतदान विरोधात गेले, हां इतिहास किमान पवारांना तरी माहित आहे.शिवाय एकदम कोलांटउडी मारून ओबीसी किंवा अन्य समाजाला एकत्र घेण्याचे प्रयत्नही राष्ट्रवादी करू शकत नाही, कारण तसं केलं तर आहे तो मराठा मतदारही नाराज होऊन दूर होऊ शकतो. त्यामुळे बाबासाहेबांना पुढे करून मराठा विरोधी ब्राम्हण असे भांडण तयार करायचे, त्यात मराठा समाजाला एकाकी पाडायचे म्हणजे पर्यायाने राष्ट्रवादीचा मतदारवर्ग संख्येने कमी होऊ शकतो, हा साधा हिशोब कॉंग्रेसच्या नेतृत्वाने मांडला आहे.
या सगळ्या गदारोळात शिवसेना वा भारतीय जनता पक्षाने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यांना भूमिका घेण्याची सोयही सरकारने ठेवलेली नाही. आज राज ठाकरे यांच्या विधानानंतर विनोद तावडे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला आहे. शिवाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा 'जाणता राजा' शरद पवार यांनीही मराठा नेत्यांना राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यात अर्थात बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाचा उल्लेख नाही. सगळ्या गदारोळानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे, की या समितीच्या अध्यक्षपदी तेच आहेत. गेले तीन दिवस चालू असलेल्या या वादात आता त्यांनी आपले तोंड उघडले आहे.

गमतीचा भाग बघा, गेल्या वेळेस २००४ सालीच्या निवडणुकीत याच बाबासाहेबांची बदनामी करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती. आज त्याच बाबासाहेबांच्या नथीतून कॉंग्रेस राष्ट्रवादीची शिकार करू इच्छित आहे. याला म्हणतात काळाचा न्याय!

Tuesday, 19 May, 2009

नाराज क्यों होते हो भाई?

लोकसभा निवडणुक संपताच आता राजकीय पक्षांची धुळवड सुरु झाली आहे। त्यात शिवसेनेच्या नेत्यांची सॉलिडच गोची झालेली दिसत आहे. तीन दिवसात शिवसेनेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या नावाने फोडायच्या होत्या तेवढ्या खडी फोडल्या. 'लोकसभेत मुम्बईचा आवाज कोण उठविणार, विचारा राजला,' ही उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया त्याच स्वरूपाची होती. म्हणजे शिवसेनेला मराठी मते मिळावित, यासाठी राज यांनी आपणहून रास्ता मोकळा करावा, ही उद्धव यांची अपेक्षा दिसते. जिथे राज यांची उपस्थिती नव्हती, अशा मराठवाडा आणि विदर्भातील जागाही शिवसेनेला मिळविता आल्या. त्याची संगती अजून त्यांनी सांगितलेली नाही.

राज यांच्यामुळे मराठी टक्का घसरला किंवा मराठी खासदार निवडून आला नाही, हे मला पटत नाही. देशात लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने निवडणुक लढविण्याचा अधिकार सगळ्याच नेत्यांना वा त्यांच्या पक्षांना आहे. लोकांना ज्या पक्षात विशेष भरोसा वाटतो त्याला ते निवडून देतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेची अनेक मते खाल्ली याबाबत काहीही शंका नाही. मात्र या निवडणुकीत मनसे एक बाजू लावून धरणार आणि मराठी मते मिळविण्याचा प्रयत्न करणार ही गोष्ट तीन वर्षांपूर्वी आपली स्वतंत्र चूल मांडतानाच राज यांनी स्पष्ट केली होती. मात्र त्यावेळी सेनेची मंडळी आणि तथाकथित माहितगार जाणकार लोक मनासेला फारशी प्रतिष्टा देण्यास तयार नव्हते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही मनसेच्या उमेदवारांनी मर्यादित यश मिळविले, त्याचीही संभावना अपयशात करण्यात आली. आता जेव्हा मनसेच्या उमेदवारांनी आपले उपद्रवमूल्य सिद्ध केले, तेव्हा कुठे सर्वांना जाणीव झाली, की हा पक्ष संसदीय राजकारणातही येऊ शकतो. मनसेच्या आतापर्यंतच्या वाटचालीला हे धरूनच झाले.

राज ठाकरे जेव्हा राज्यातील गणेश मंडळाच्या कार्यकर्यांना भेटत किंवा मुंबईत मी मराठी उत्सवाचे आयोजन करत त्यावेळी त्याची संभावना संक्षिप्त या सदराच्या पलिकडे होत नसे। हा माणूस काहीतरी करतोय, तो आपोआप थंड होईल, द्या त्याला थोडी प्रसिद्धी अशी भावना त्यावेळी होती. त्यानंतर परप्रांतियांच्या मुद्यावर आक्रमक झाल्यावर माध्यमांनी मनसेची दखल घेतली.

राज ठाकरे यांनी मराठी जनतेसाठी काय केले, असा प्रश्नही ही मंडळी विचारत असत। त्याचीच री वर्तमानपत्रेही ओढत असत. मात्र असा प्रश्न विचारणाऱया लोकांनी, थोडक्यात कॉंग्रेस, भाजप किंवा राष्ट्रवादी या पक्षांनी मराठीच जाऊ द्या, लोकांसाठी काय केले हा प्रश्न कोणीही विचारला नाही. ज्यावेळी जेटच्या कर्मचाऱयांवर संक्रांत आली आणि त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली त्याचवेळीस वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, याचा अंदाज आला होता. मात्र त्यावेळी त्यांनी राज यांना दहशतवादी, गुंड अशी प्रतिमा देऊ केली होती. महाराष्ट्रात एकाही व्यक्तीच्या भाषणात दिसून येणारा, अन्य लेख किंवा पुस्तकातला संदर्भ देण्याचा गुण मुद्दाम दुर्लक्षित करण्यात आला. राज यांची ही राजकीय खेळी निःसंशय, मात्र ते वेगळेपणच ठरावे. उद्धव ठाकरे यांनी विदर्भात शेतकऱयांच्या प्रश्नावर घेतलेल्या लाखा-लाखांच्या सभा मी पाहिल्या आहेत. तो मुद्दा उद्धव यांच्याइतका कोणीही प्रभावीपणे मांडला नाही. त्यांच्या आंदोलनामुळेच केंद्राला शेतकऱयांसाठी पॅकेज जाहीर करावे लागले. असे असूनही, त्यांना म्हणावे तितके यश मिळाले नाही. याचा दोष राज यांच्याकडे कसा जातो?

आज शिवसेनाप्रमुखांनी जाहीर केले, की राज यांच्यासोबतचे सर्व संबंध तोडले। मात्र आता गरज संबंध जोडण्याची असताना हे संबंध तोडण्यासारखे आक्रस्ताळे निर्णय जाहीर होत आहेत. मुळात शिवसेना किंवा मनसे एकत्र येण्याने शिवसेनेला मिळणारी मते वाढतील, हे गृहितकच चुकीचे आहे. १९९९ किंवा २००४ मध्ये राज ठाकरे शिवसेनेसोबतच होते ना. मग त्यावेळी पक्षाला अपयश का आले? आज मनसेला मिळणारी मते केवळ मराठी म्हणून नाही. ती तरुणांची मते आहेत. या तरूणांना धर्म, जात किंवा काही प्रमाणात प्रांतांचीही मर्यादा नाही. अरेला कारे म्हणणाऱया या तरूणाला रस्त्यावर येण्यासाठी एका हाकेची गरज आहे. ती हाक देण्याची ताकद सध्याच्या घडीला केवळ राज ठाकरे यांच्याकडे आहे, हे निवडणुकीच्या निकालाने सिद्ध झाले आहे.

त्यामुळे सध्यातरी शिवसेनेने राज यांच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा राजकीय डावपेचांचा अधिक विचार करावा. नाहीतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मनोरथांमध्ये मोडता घालायला मनसे आहेच.